गडचांदूर (वार्ताहर):
गडचांदूर शहरात यंदाचा देवी विसर्जन सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, शांततेत आणि नियोजनपूर्वक पार पडला. ठाणेदार शिवाजी कदम यांनी आखलेल्या नियोजनामुळे संपूर्ण विसर्जन प्रक्रिया सुव्यवस्थितपणे पूर्ण झाली. शहरभर त्यांच्या नेतृत्वाची आणि नियोजनाची विशेष चर्चा रंगली आहे.

ठरवून दिलेल्या वेळेनुसार अचूक रात्रो १०:५८ वाजता डॉल्बी साऊंड बंद करण्यात आला, ही शिस्त नागरिक आणि मंडळांनी स्वयंस्फूर्तीने पाळली. शहरातील प्रमुख चौकांवर पोलीस बंदोबस्त तैनात होता. वाहतुकीची कोंडी होऊ नये, तसेच विसर्जन मार्गावरील शिस्त अबाधित राखण्यासाठी पोलीस कर्मचारी व नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय साधला.

ठाणेदार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, कर्मचारीवर्ग, वाहतूक शाखा आणि महिला पोलीस अधिकारी यांनी उल्लेखनीय सेवा बजावली. विशेष म्हणजे महिला पोलिसांनी गर्दीत महिलांची सुरक्षितता, जनजागृती व शिस्त राखण्याचे उत्कृष्ट कार्य केले, ज्याचे शहरभर कौतुक होत आहे.
शहरातील नागरिकांनीही प्रशासनाचे आभार मानत सांगितले की, “यंदाचे विसर्जन हे खऱ्या अर्थाने आदर्शवत होते. वेळ, आवाजमर्यादा आणि शिस्त — सर्व काही उत्तम रीतीने पाळले गेले.”
या नियोजनामुळे गडचांदूर शहराने दाखवून दिले की — परंपरा, श्रद्धा आणि शिस्त या तिन्ही गोष्टी एकत्र नांदू शकतात.



