वणी (यवतमाल):
वेकोलिच्या (WCL) कोळसा वाहतुकीत होणाऱ्या मोठ्या हेराफेरीचा अखेर भांडाफोड झाला आहे. जामनगर येथील मेसर्स कृष्णा इंफ्रास्ट्रक्चर प्रा.ली.आणि दोन ट्रक चालकांनी संगनमत करून कोळशात माती-गिट्टी मिसळून ‘महाजेनको’ला चुना लावल्याचे समोर आले आहे. मात्र, या गंभीर प्रकरणात तक्रार नोंदवून घेताना वणी पोलिसांनी जी ‘टाळाटाळ’ केली, त्यावरून पोलीस प्रशासनाच्या प्रामाणिकपणावर आता संशयाची सुई वळली आहे.
नेमकी घटना काय?
२२ आणि २३ फेब्रुवारी रोजी रेल्वे सायडिंगवर आलेल्या दोन ट्रकमध्ये (CG 11 AB 9033 आणि CG 15 EX 3274) कोळशाचे प्रमाण कमी आढळले. इतकेच नाही तर, उच्च दर्जाच्या कोळशाच्या नावाखाली त्यात माती आणि गिट्टी मिसळल्याचे सुरक्षा रक्षकांच्या तपासात निष्पन्न झाले. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांना चकमा देऊन दोन्ही ट्रक चालक पसार झाले, ज्यामुळे या रॅकेटमध्ये मोठे मासे असल्याचा संशय बळावला आहे.
पोलिसांची ‘ढिलाई’ की कोल माफियांना अभय?या प्रकरणात सर्वात संतापजनक बाब म्हणजे वणी पोलिसांचा दृष्टिकोन.
दोन तास ताटकळत ठेवले:
वेकोलिचे महाव्यवस्थापक (GM) आणि वरिष्ठ अधिकारी मंगळवारी रात्री तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले, तेव्हा ठाणेदार गोपाल उंबरकर यांचा पत्ताच नव्हता. अधिकाऱ्यांना दोन तास ताटकळत रिकाम्या हाती परतावे लागले.
राष्ट्रीय संपत्तीची चोरी तरीही दिरंगाई: कोळशासारख्या राष्ट्रीय संपत्तीची उघडपणे लूट होत असतानाही पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याने वणीत चर्चेला उधाण आले आहे.
चौकशीचे नाटक: बुधवारी २५ फेब्रुवारीला गुन्हा नोंदवला असला, तरी पोलीस आता केवळ ट्रक चालकांवर कारवाई करून मूळ मालकांना पाठीशी घालणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
“आम्ही गुन्हा नोंदवला आहे, टाळाटाळ केल्याचा आरोप चुकीचा आहे,” असा बचाव ठाणेदार गोपाल उंबरकर करत असले, तरी वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या संदर्भात वणी येथील बुद्धजीवी नागरिकामध्ये तीव्र संताप दिसून आला . वणी शहरात व शहर परिसरात परप्रांतीय गुन्हेगारांचे टोळके वस्त्याव्यात आहे . डब्ल्यूसीएल वणी नार्थ येथे बिना पोलीस वेरिफिकेशन अनेक गुन्हेगारी प्रवृत्तिचे लोक काम करत असून गुन्हा करून ते आपल्या राज्यात पळून जातात ह्यवर वणी पोलीस मूंग गिळुन हातावर हात देऊन आहेत . पोलीस अधीक्षक यानी वणीला भयमुक्त करण्यासाठी कोणीतरी कर्तृत्ववान सिंघम ठानेदार द्यावा अशी मागणी जोर धरत आहे .



