चंद्रपुर ( का.प्र. )
राजुरा–गोविंदपूर NH-353B राष्ट्रीय महामार्गावर झालेले काम हे केवळ निष्काळजीपणाचे नव्हे, तर भारी गैरव्यवहाराचे जिवंत उदाहरण असल्याचा आरोप स्थानिकांनी जोरात उपस्थित केला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दबललेली पृष्ठभाग, खोल खड्डे, वाहतुकीसाठी असुरक्षित स्थिती — हे चित्र आज सार्वजनिक पैशाची थेट खिल्ली उडवत आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, रस्त्याच्या बांधकामासाठी लहान नदी-नाल्यांचा गाळ, सिल्ट-मिश्रित माती व अप्रशिक्षित साहित्याचा वापर करून काम उरकल्याची माहिती समोर येत आहे. हे कुठल्याही राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जात बसणारे नसून, जीआर इंफ़्रा प्रोजेक्ट प्रा.ली. या मुख्य कंत्राटदाराच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
तामशी रेती घाटातून झाले अवैध उत्खनन — सीसीटीवी गायब करून पुरावे गायब!
कामादरम्यान तामशी रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात अवैध रेत उत्खनन करण्यात आले. त्यात वापरलेली रेत थेट महामार्गावर टाकल्याची खबरदार माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्याहून गंभीर बाब म्हणजे, उत्खनन आणि वाहतुकीचे ठोस पुरावे मिळू नयेत म्हणून सीसीटीवी कॅमेरे चोरी गेल्याची बनावट बतावणी करून पुरावे नष्ट करण्यात आल्याचा आरोप सर्रास केला जातोय. हे चोरटे कॅमेरे नाहीत, हा संपूर्ण गैरव्यवहार लपवण्याचा डाव असल्याचा आरोप जनतेतून होत आहे.
तहसीलदार व एसडीओचे आदेश धाब्यावर — पीडब्ल्यूडी गड़चांदुरचे संशयास्पद मौन
तहसीलदार कोरपना आणि उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी स्पष्ट आदेश देऊनही पीडब्लूडी विभागाने तामशी रेती घाटाची मोजणी न करणं हे संशयानं भरलेलं पाऊल मानलं जात आहे. प्रशासकीय आदेशांकडे केलेली ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष, हा कोणीतरी “वरून दिलेला संदेश” असल्याची चर्चा जास्त वेगाने पसरत आहे.
एनएचएआयच्या प्रबंधकांची भूमिका धूसर — संरक्षण की संगनमत?
एनएचएआयचे प्रबंधक यांनी तक्रारी आल्यानंतरही चौकशी न करणं, दोषींवर कोणतीच कारवाई न करणं, आणि सततचा मौन यामुळे त्यांच्या भूमिकेवर मोठा संशयाचा काळा डाग बसला आहे.
जनतेचा थेट आरोप — “हे निकृष्ट काम झाकण्यासाठी कुणाचं तरी संरक्षण दिलं जात आहे!”
विधानसभेत पेटणार मोठा प्रश्न
पूरक, निकृष्ट आणि धोकादायक काम, अवैध रेत उत्खनन, पुरावे नष्ट करण्याचा कट, जिल्हा प्रशासनाचा मौन, पीडब्लूडी ची दुर्लक्ष वृत्ती आणि राष्ट्रीय महामार्ग ऑथोरिटी ऑफ इंडिया यांची संशयास्पद भूमिका —
या सर्वांचा मिळून एक मोठा भ्रष्टाचाराचा स्फोट होणार असून येणाऱ्या विधानसभेत हा विषय जोरदारपणे घुमणार हे आता निश्चित झाले आहे.



