राजुरा तालुका प्रतिनिधि – प्रविण चिडे, विरुर
विरुर परिसरात मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी काही अज्ञात व्यक्तींनी इंदिरानगर परिसरात 11 केव्ही उच्चदाब विद्युत लाईनवर हूक टाकून जंगलात जिवंत तार पसरवली होती. या कृत्यामुळे संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित झाला आणि विरुरवासीयांची संपूर्ण रात्र अंधारात गेली.
महावितरण विभागाचे कर्मचारी रात्रीपासून पहाटेपर्यंत लाईनवरील फॉल्ट शोधण्याचा प्रयत्न करत होते. रात्रभर शोध घेतल्यानंतर अखेर पहाटे 4 वाजता इंदिरानगर शिवारात जंगल परिसरात तार पसरवलेली असल्याचे निदर्शनास आले. त्वरित महावितरण कर्मचाऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून संपूर्ण माहिती दिली.
दरम्यान, अनेक नागरिक रात्रभर वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरण विभागावर संताप व्यक्त करत होते. काहींनी तर कर्मचाऱ्यांशी फोनवरून वादही घातला. परंतु वास्तव असे की, महावितरणचे हेच कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता अंधाऱ्या जंगलात जाऊन फॉल्ट शोधत होते. त्यांनी केलेल्या तत्पर प्रयत्नांमुळे मोठा अपघात टळला आणि एका संभाव्य शोकांतिकेपासून गाव वाचले.
वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी अशा प्रकारे विद्युत सापळा लावणे ही अत्यंत गंभीर आणि गुन्हेगारी प्रवृत्ती दर्शवणारी बाब आहे. अशा प्रकारच्या घटनांवर वनविभागाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
वन्यजीव हे निसर्गसाखळीचा महत्त्वाचा घटक आहेत. त्यांच्या जीवावर उठणारे हात रोखण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. अन्यथा, अशा गुन्हेगारी वृत्तीमुळे एखाद्या दिवशी एखाद्या व्यक्तीचा किंवा प्राण्याचा बळी जाणे अनिवार्य ठरेल.
या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले की, आपल्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांचा आदर करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.



