चंद्रपूर:( विजय ठाकरे )
एका बाजूला जनतेच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या ‘वस्तू व सेवा कर भवन’ इमारतीच्या उद्घाटनासाठी जिल्ह्यातील बडे नेते, मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ताफा हसतमुखाने हजेरी लावत आहे. तर दुसरीकडे जिवती तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील आदिवासी तरुणीला प्रसूती वेदना होत असताना साधी एक रुग्णवाहिका मिळू शकत नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव आणि भीषण वास्तव दुसरे काय असू शकते ?
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आंगनबाड़ी सेविका संगीता ( वय वर्ष १८ ते २०) नावाच्या निष्पाप आदिवासी तरुणीला प्रसूती कळा येऊ लागल्या. तिच्या कुटुंबाने शासकीय आरोग्य व्यवस्थेकडे वारंवार मदतीची याचना केली, रुग्णवाहिका मागवली. परंतु, रस्ते खराब असल्याचे किंवा वाहन उपलब्ध नसल्याचे नेहमीचेच कारण पुढे आले असावे. अखेर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे, त्या वेदना असहनशील झाल्याने रस्त्यातच तिची प्रसूती झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म तर दिला, पण अत्यंत वेदनेत आणि वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्या माऊलीने रस्त्यावरच आपले प्राण गमावले. बाळ सुखरूप असले, तरी जन्माला येताच त्याच्या डोक्यावरून आईचे छत्र कायमचे हरवले आहे.
एकीकडे झगमगाट, दुसरीकडे अंधार !
ज्या पैशातून या आलिशान इमारती उभ्या राहतात, तो पैसा याच सामान्य जनतेचा असतो. पण जेव्हा याच जनतेला जगण्यासाठी किमान आरोग्य सुविधांची गरज असते, तेव्हा यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली दिसते. नेत्यांच्या दौऱ्यांसाठी आणि उद्घाटनांच्या सोहळ्यांसाठी प्रशासकीय यंत्रणा चोवीस तास तत्पर असते, मग एका गर्भवती माऊलीचा जीव वाचवण्यासाठी एक रुग्णवाहिका वेळेवर का पोहोचू शकत नाही ?
बाळाचा निष्पाप चेहरा आणि आईचा तो शेवटचा फोटो पाहून आज संपूर्ण चंद्रपूर जिल्हा स्तब्ध झाला आहे, पण यंत्रणेला याचे काही सोयरसुतक आहे का ?
जनतेचा संतप्त सवाल
राजकारण्यांचे हे उद्घाटनांचे सोहळे आणि हसरे चेहरे अशा निष्पाप मृत्यूंसमोर लाजीरवाणे ठरत आहेत. या माऊलीच्या मृत्यूची जबाबदारी प्रशासन घेणार का ? दुर्गम भागातील गोरगरीबांना अजून किती काळ अशा प्राथमिक सुविधांसाठी आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागणार ?
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दोषी अधिकाऱ्यांवर आणि बेजबाबदार यंत्रणेवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
हया विषयी चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांना संपर्क केला असताना नेहमी प्रमाणे कॉल रिसीव न करता बीप देऊन वॉइस रेकॉर्ड करा असे संदेश दिले ..



