कामगार नेते विजय ठाकरे यांनी केली आमदार विजय वडेट्टीवार यांच्यामार्फत वरिष्ठ अधिकारी कड़े उच्चस्तरीय चौकशीची मागणी
घुग्गुस/चंद्रपूर:
कोंडाफाटा महामार्ग पोलिसांच्या वसुली प्रकरणाने चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली असतानाच, आता या प्रकरणात नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. ३० हजार रुपयांच्या कथित वसुलीची तक्रार वरिष्ठ स्तरावर पोहोचल्यानंतर, आपली नोकरी वाचवण्यासाठी महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराला दमदाटी करून तक्रार मागे घेण्यास भाग पाडल्याचा गंभीर प्रकार घडल्याची माहिती विभागातील सूत्राकड़ून प्राप्त झाली.
नेमके प्रकरण काय?
२१ जानेवारी २०२६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट येथील प्रदीप पिंपळकर हे आपल्या ट्रॅक्टरने बाभळीची लाकडे घेऊन जात असताना, पांढरकवडा जवळ महामार्ग पोलिसांनी त्यांना अडवले. सर्व कागदपत्रे वैध असतानाही दीड लाखाच्या दंडाची भीती दाखवून ‘शिवम मंडल’ (निवासी मुलचेरा) याच्या **QR Code** वर ३० हजार रुपये वळते करून घेतल्याचा आरोप झाला होता. प्रकरणाची चौकशी घुग्घुस पोलिसांकडे सोपवण्यात आली होती. मात्र, ताजी माहिती अशी की, संबंधित महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदारावर प्रचंड दबाव टाकला. यामुळे पीडित तक्रारदाराने “मला पुढील कारवाई करायची नाही” असे लेखी दिल्याने चौकशी थंडावल्याचे चित्र आहे.
” मुलचेरा निवासी शिवम मंडल याच्या बँक व्यवहारांची आणि संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली असता, फिर्यादीने ‘पुढील कारवाई नको’ असे लेखीपत्र दिले. त्यामुळे तसा अहवाल आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूरकडे सोपवला आहे.”
शंकर मन्ने, पोलीस हवालदार, घुग्घुस
वरिष्ठ पोलीस अधीक्षकांचा हस्तक्षेप
या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याने महामार्ग पोलीस अधीक्षक (नागपूर) यांनीही याची दखल घेतली आहे. चिमूर तालुक्यातील मुरपार येथील अशाच एका प्रकरणाची चौकशी सध्या डीवायएसपी (DySP) स्तरावर सुरू आहे.
“मुरपार येथील चौकशी DySP कडे सोपवली आहे. चौकशी अहवाल प्राप्त होताच तो वरिष्ठांकडे कारवाईसाठी पाठवला जाईल.”
साळुंखे, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस, नागपूर
कामगार आणि लोकप्रतिनिधी यांचा संताप
पोलीस प्रशासनाकडून तक्रारदारावर होणारा दबाव आणि वसुलीच्या वाढत्या घटना पाहता, कामगार नेते विजय ठाकरे यांनी घुग्गुस व मुरपार गंभीर घटनेची दखल घेतली असून यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ माजी विरोधी पक्षनेते तथा सन्माननीय आमदार विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार आहे. तसेच, मुंबई येथे IG (महामार्ग पोलीस) यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हे नोंदवण्याची मागणी निवेदनाद्वारे केली जाणार आहे.
एकूणच शेतकरी – शेत मजूर – सामान्य नागरिक ह्यांना दिवसा ढवळ्या लुटणाऱ्या हया टोळीचा संपूर्ण कर्मकांड उघड़ करण्याचा संकल्प बुद्धजीवी नागरिकांनी घेतला असल्याचे चित्र दिसत आहे .
पुढील भागात वाचा: शेतकऱ्याची ₹ १० हजारांची मोटारसायकल आणि त्यावर पोलिसांनी ठोकले चक्क १२,५०० रुपयांचे चालान! महामार्ग पोलिसांचा ‘मनोज पिदुरकर’ पॅटर्न नेमका काय आहे?



