🔴 देवाडा-सिदूर पिपरी मार्गा वरील पुल खचला
चंद्रपूर: ( गौतम भसारकर )
“ना खाऊंगा, ना खाने दूंगा” अशा घोषणा दिल्या जात असल्या, तरी चंद्रपूर जिल्ह्यात मात्र ‘सबने मिलकर खाया’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत (PMGSY) कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या रस्ते व पूल कामात ५६% कमिशनखोरी झाल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. अवघ्या ४४% रक्कमेतून काम झाल्यामुळे कामाचा दर्जा अत्यंत सुमार झाला असून, चक्क गॅरंटी अवधीतच (दोष निवारण कालावधी) पूल धसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
🛑कार्यकारी अभियंता पियुष लोखंडेंच्या पीडब्लूडी ( सेंट्रल ) काळात काम, मग आता जबाबदार कोण ?
मिळालेल्या माहितीनुसार, हे काम तत्कालीन कार्यकारी अभियंता *पियुष लोखंडे* यांच्या कार्यकाळात झाले होते. मात्र, काम पूर्ण झाल्यावर त्यांची बदली झाली. आता प्रश्न असा निर्माण होतो की, पूल धसल्यानंतर आणि रस्त्याची दुरवस्था झाल्यानंतर याची मुख्य जबाबदारी कोणाची? कंत्राटदार *मे. गौरव कन्स्ट्रक्शन* ची की ५६% कमिशन लाटणाऱ्यांची ?
📲 नवीन साहेबांना फोन उचलायला वेळ मिळेना !
या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी नागरिक जेव्हा संपर्क साधतात, तेव्हा त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुख्य अभियंता महतो यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आलेले नवीन अधिकारी *रेहान खान* यांना नागरिकांचे आणि प्रवाशांचे फोन उचलायला वेळच मिळत नसल्याने जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रोज किरकोळ अपघात; वाहनांचे प्रचंड नुकसान
धसलेला पूल आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या मार्गावर रोज किरकोळ अपघात घडत आहेत. दुचाकीस्वार घसरून पडत असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. एखाद्याचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
कामाचे अधिकृत फलकावरील तपशील:
*कामाचे नाव:* प्रसामा-१४ (नागाळा) ते रामा ३७३ रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे (तालुका व जिल्हा: चंद्रपूर)
पॅकेज क्रमांक:MH 08-19 | टप्पा क्र. प्रमग्रायो-III, बॅच-१
*लांबी व किंमत:* ७.१९४ कि.मी. लांबीच्या या कामाची करारानामा किंमत रु. ३४१.९० लक्ष (३ कोटी ४१ लाख ९० हजार) इतकी आहे.
*दोष निवारण कालावधी (गॅरंटी):* ५ वर्ष (देखभाल दुरुस्ती किंमत रु. २७.१६ लक्ष)
*कंत्राटदाराचे नाव:* मे. गौरव कन्स्ट्रक्शन, चंद्रपूर
यंत्रणा:कार्यकारी अभियंता, प्रमग्रायो, म.ग्रा.र.वि. संस्था, चंद्रपूर.
नागरिकांचा सवाल:५ वर्षांची गॅरंटी असताना आणि कोट्यवधींचा निधी खर्च झाला असताना रस्ता व पूल पहिल्याच काही वर्षांत धसतोच कसा ? या महाभ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून कंत्राटदार आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



