राजुरा
प्रविण चिडे राजुरा तालुका प्रतिनिधि
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राज्यभर राबविण्यात येणारा महसूल सेवा पंधरवडा उपक्रम ग्रामीण भागात प्रभावी ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून (१७ सप्टेंबर) सुरू होणारा आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत (२ ऑक्टोबर) चालणारा हा उपक्रम नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन सोडविण्यावर भर देतो.
राजुरा तालुक्यातील चिंचोली (बु) येथे २४ सप्टेंबर रोजी या उपक्रमाचा विशेष कार्यक्रम झाला. तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन नुकसानीची पाहणी केली. पंचाळा, मणगाव रिठ, सातरी, चणाखा, सिंधी, नलफळी या गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेट देत पंचनामा करण्यात आला आणि तातडीने मदत मिळावी यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले.

शेतकऱ्यांना दिलेली मार्गदर्शन व सेवा :
पिकांचे पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करणे.
पांदण व शिवार रस्त्यांची नोंदणी, मोजणी आणि सीमांकन.रस्त्यावरील वादांचे निराकरण.सरकारी जागेवरील अतिक्रमण व पट्ट्यांबाबत मार्गदर्शन.
ई-पीक नोंदणी, फार्मर आयडी नोंदणीबाबत मदत.सार्वजनिक सुविधा अतिक्रमणमुक्त करण्याबाबत सूचना.
या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांबाबत आणि शासनाच्या योजनांबाबत सविस्तर माहिती मिळाली. ग्रामस्थांनी महसूल विभागाने गावात येऊन थेट समस्या ऐकल्याने समाधान व्यक्त केले.
उपस्थित मान्यवर ; कार्यक्रमाला तहसीलदार ओमप्रकाश गोंड, मंडळ अधिकारी विरुर सुभाष साळवे, तलाठी परेज मैदंवार, सरपंच पिलाजी भोंगळे, उपसरपंच पुष्पांजली धनवलकर, पोलीस पाटील संतोष नेवारे, ग्रामपंचायत सदस्य भास्कर वाघमारे, वर्षा तावाडे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व महिला नागरिक उपस्थित होते.
महसूल सेवा पंधरवडा हा केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता, शेतकऱ्यांना दिलासा आणि शासनाशी थेट संवाद साधण्याचे व्यासपीठ ठरत असल्याचे प्रतिपादन तहसीलदार गोंड यांनी केले.



